Valentines Day

valentines day, 14 feb, techunger

Valentines Day Special

प्रेम म्हणजे...प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ही पाडगावकरांची कविता खूप काही सांगून जाते. पण Book सोडून Facebook च्या आहारी गेलेलो आम्ही, आम्हाला पुस्तकातली ती कविता वाचायला वेळच नाही. प्रेमाच वर्णन करतांना कवी सुंदर अशा घटना मांडतात. ज्या प्रेमात एख्याद्याला सामाऊन घेण्याची, उष्मा देण्याची ताकद आहे तेच प्रेम तुमच्या आमच्या सारख्यांच्या अयशस्वीतेच कारण बनत चाललंय आणी त्याच कारण म्हणजे अर्थाचा अनर्थ करण्याचा आमचा Technically Update स्वभाव. पाडगावकरांनी सांगितलेलं प्रेम आणी तुम्ही-आम्ही करतो ते प्रेम यांमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. पाडगावकरांनी सांगितलेलं प्रेम हे एका विशिष्ट व्यक्तीला उद्देशून नाहीए. ते आई वरही असु शकतं व वडिलांवरही असू शकतं, भाऊ व बहिण, नवरा व बायको, मित्र व मैत्रीण, एखादी वस्तू, वास्तू इत्यादी. कोणावरही असू शकतं पण तुम्ही आम्ही जे प्रेम करतो ना ते एका विशिष्ट व्यक्तींपर्यंत मर्यादित असतं आणि म्हणूनच खर प्रेम कधी आम्ह्याला कळलंच नाही. वाढत्या वयाप्रमाणे निर्माण होणाऱ्या आकर्षण आणी मोहालाच आम्ही प्रेम समजतो. म्हणूनच आमचं प्रेम काही काळात नष्ट होत.
खर प्रेम समजुन घेण्यासाठी सद्यपरिस्थितीतील प्रेमाच्या सगळ्या कल्पना विसरून नवीन काहीतरी जाणून घेण्याची इच्छा बाळगावी लागेल. नारद भक्ती सूत्रात स्वतः नारदांनीच प्रेमाची व्याख्या केली आहे.

नारद म्हणतात प्रेम म्हणजे आकर्षण नाही. कारण आकर्षण मोहातही असू शकते व मोह आणी प्रेमात फरक आहे.

तो फरक सांगतांना नारद सांगतात...

ह्या सहा गोष्टी ज्याच्यात असतील त्याला प्रेम म्हणतात.

techunger.com

१) गुणरहितम्

प्रेम हे गुणरहित असलं पाहिजे. समाज सांगतो कि गुण जुळले कि प्रेम होतं, नाही तर नाही. पण नारद म्हणतात की गुण जुळल्यावर मोह होतो, प्रेम नाही. समजा एखाद्यामध्ये ‘सत्यनिष्ठा’ हा गुण आहे आणि त्याने प्रभावित होऊन आपण त्याच्यावर प्रेम केलं आणि काही दिवसांनी जर तो खोट बोलला तर आपल्या नजरेत तो खराब होतो म्हणजेच आपलं त्याच्यावरचं प्रेम कमी होतं. म्हणून विवाहित किंवा आपल्या सारखेही जे प्रेम करतात त्यांच्यात दुरावा निर्माण होण्याचं तेच कारण असतं. कारण सुरुवातीला एकमेकांचे गुण आवडल्याने प्रेम करतात आणि नंतर जवळीक निर्माण झाल्यावर एकमेकांचे दोष कळतात आणि परिणामी Divorce किंवा Brake-up होतो. असं गुणरहित प्रेम आपण कुणावर करत असु की नाही याचा विचार करावा लागेल. म्हणून गुणरहितम् ही प्रेमाची व्याख्या आहे. जी खूप आवघड आहे. पण अलौकिक आहे.


२) कामनारहितम्

कामनारहीतता हे प्रेमाचे दुसरे लक्षण सांगण्यात आले आहे. प्रेम व काम ह्या दोन्हीत फरक आहे. आपल्याला जो प्रिय आहे त्या प्रियकराला सुख देणे हे प्रेम आहे. पण प्रियकराकडून सुख मागणे किंवा सुखाची अपेक्षा करणे हा काम होय. प्रियकराकडून आपल्याला सुख नक्कीच मिळते; पण त्याची इच्छा ठेवता कामा नये. म्हणून कामनारहित प्रेम म्हणजे असे प्रेम की जे प्रियकराकडून सुखाची अपेक्षा न करता प्रियकराला सुख देते.


३) प्रतिक्षणवर्धमानम्

प्रेमाचे तिसरे लक्षण सांगतांना नारद म्हणतात, ‘प्रतिक्षणवर्धमानम’ क्षण-प्रतिक्षण वाढते ते प्रेम. आपलं प्रेम दुधासारखं असतं. जे सुरुवातीला उतू जातं, नंतर आटतं आणी काही काळाने करपून जातं. अस प्रेम नसतं. प्रेम हे क्षण-प्रतिक्षण वाढतच गेलं पाहिजे. आपलं होत काय माहिती ए का? आपण एकमेकांच्या जेवढ जवळ येतो तेवढ प्रेम कमी होतं. कारण जवळ आल्यावर गुणदोष कळतात आणि परिणामी आपोआप प्रेमाची तीव्रता कमी होते. पण नारद म्हणतात की गुणदोष कळूनही जे प्रत्येक क्षणाला वाढत जातं तेच खरं प्रेम. अन्यथा ते प्रेम नाही, मोह होय.


४) अविच्छिन्नम्

प्रेमाचे चौथे लक्षण आहे ‘आविच्छिन्नम्’. जे प्रेम अविच्छिन्नम् म्हणजे अखंड आहे, सलग आहे, जे तुटत नाही तेच खरं प्रेम म्हंटल जातं. प्रेम हे Non-breakable असते. जे Break होते ते प्रेम नाही मोह असतो. आजकाल प्रदेशात Trial love आणि Trial Marriages चा नवीन Trend पहायला मिळतो. त्याला प्रेम म्हणत नाहीत. प्रेम कधीही संपत नसते, एखाद्या वस्तु किंवा व्यक्तीवरील प्रेमात कधीही खंड पडत नाही तेच खरे प्रेम.


५) सुक्ष्मात्त्सुक्ष्मतरम्

‘सुक्ष्मात्त्सुक्ष्मतरम्’ हे अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे. कारण प्रेम हे सूक्ष्म असते. त्याचा देखावा नसतो, प्रेम कधी व्यक्त झाले कळताही कामा नये, प्रेम करतो याचा गाजावाजा देखील करायचा नसतो. खऱ्या प्रेमामध्ये दोन मन जुळलेली असतात, दोन विचार जुळलेले असतात, खऱ्या प्रेमात गाजावाजा नाही तर eye-contact असतो, heart-contact असतो. खऱ्या प्रेमात देखावा/गप्पा नाही तर आतल्याआत गुदगुल्या होतात. सूक्ष्म-सूक्ष्म/लहान-सहान गोष्टींवरही ज्यात चर्चा होते, tranprarency (पारदर्शकता) असते तेच खरे प्रेम. आपण बारीक-बारीक गोष्टी एकमेकांना सांगण आवश्यक समजत नाही. पण खऱ्या प्रेमात तेच गरजेच असतं. त्यानेच एकमेकांचे दोष नष्ट होऊन ‘गुण’ फुलतात.


६) अनुभवरुपम्

प्रेमात अनुभव असला पाहिजे. चार वेगवेगळ्या व्यक्तींसोबत प्रेम करून मिळालेला अनुभव नाही. प्रेमात प्रतिसाद (Responce) असला पाहिजे. खऱ्या प्रेमामध्ये प्रियकराकडून एवढीच अपेक्षा असावी. आपण जे प्रेम करतो त्याची प्रियकराला जाणीव आहे, कदर आहे असा अनुभव आला पाहिजे. प्रियकराकडून आपल्याला काहीही नकोय, त्याने आपल्या साठी काही केले नाही तरी चालेल. पण आपल्या प्रेमाची प्रियकराला जाणीव आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. यालाच म्हणतात अनुभवरूपम्. प्रेमाचे हे सहा प्रकार जिथे एकत्र येतात तिथेच खरं प्रेम निर्माण होतं आणी तेच प्रेम दीर्घकाळापर्यंत टिकतं देखील. मोहतून निर्माण झालेलं प्रेम काही काळातच नष्ट होतं, म्हणून प्रेम हे दीर्घकालीन असावं. दीर्घकालीन प्रेम आपल्या ऋषीमुनींनी निसर्गावर केलं, आचार्यांनी विद्यार्थी व मानवावर, संतांनी पांडुरंगावर, मावळ्यांनी स्वराज्यावर, आणी क्रांतीकारकांनी भारत मातेवर केलं. आजही पंढरपूरच्या पांडुरंगाचा विषय जरी निघाला तरी निवृत्ती-ज्ञाननदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-नामदेव-तुकाराम या प्रियकरांची नावे आधी येतात. भारत माता की जय म्हणतांना सगळ्यांच्याच अंगावर देश-भक्तीचे शहारे येतात, याचं कारण भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भौतिक सुखाचा त्याग करून प्राणाचीही पर्वा न करता 'लढा' देणाऱ्या क्रांतिकारकांचे प्रेम आहे. प्रेम हे तुटुन करता आलं पाहिजे. प्रेमात आंधळं न होता डोळे उघडे ठेऊन प्रेम करता आलं पाहिजे, प्रेमात वेडं न होता शहणपणांन प्रेम करता आलं पाहिजे आणि एवढंच नाही तर प्रेमात यशस्वी व्हायचं असेल तर नारदांनी सांगितल्या प्रमाणे प्रेम करता आलं पाहिजे. गुणरहित-कामनारहित असलेलं, क्षण-प्रतिक्षण वाढत जाणारं, खंड न पडता अखंड असणारं, लहाणसहान गोष्टींमध्ये पारदर्शकता असलेलं, आणि अनुभवता येईल असं प्रेम करता आलं पाहिजे. पण त्यासाठी प्रचलित प्रेमाची संकल्पना विसरून नविन करण्याची इच्छा असावी लागेल. असं प्रेम जर आपण करू शकलो तर राधा-कृष्ण, राम-सुग्रीव, संत-पांडुरंग, लैला-मजनु यांच्या नंतर इतिहासाला देखील आपलं नाव घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. शिवाय असं प्रेम करणे ही काय आज propose आणी उद्या होकार अशी प्रक्रिया नाही. ही वडाच्या झाडासारखी प्रक्रिया आहे, थोडा वेळ लागतो पण एकदा झालं की वर्षानुवर्षे संपत नाही. असं प्रेम करण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध होऊया, आणी यश गाठुया.



article by : Tejas Shivaji Ranbawale





join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

events

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या